Thursday, April 12, 2012

तृष्णेचा बळी


स्टार माझा वर काल ( ११ एप्रिल २०१२)    एक बातमी पहिली त्या बातमी वर आधारित मनात ही कविता आली. आपण हि ही बातमी पहिली तर मनास वेदना होतात. लोकांनी हेल्मेट घातलेले माकड अशी केलेली टिपणी मात्र संताप निर्माण करते.

http://www.umovietv.com/Video/watch.aspx?v=News&i=qezhuc9ZnEY&s=Yavatmal%20Monkey%20Trapped..
तृष्णेचा बळी
ऋतू चक्रातून आला तो  ग्रीष्म
नभी आग भडके तापले ते अश्म
विदर्भात  त्यातून तीव्रता ती भारी
जाळूनी जळाला  आसमंतात सारी

नदी नाले ओढे कोरडे तलाव
प्रतिवर्षी सृष्टी का खेळे हा डाव
भावी ऋतूचा जरी हा  सु हेतू
परी आता जैसे  ग्रासती राहू केतू

जीवन म्हणजे काय ह्या प्रश्ना
उत्तर सोपे लागता ती तृष्णा
एकेका थेंबासाठी  करीत पाणी पाणी
शोधाया  चहूकडे धावती सर्व प्राणी

अशाच त्यात एका मर्कटाचा तान्हुला
पिण्यासाठी पाणी व्याकूळ तो झाला
तहानलेला तो मुका बाळ जीव
गावात एका धावला ओलांडून शीव

स्वैर फिरता फिरता पोर तो रडवा
कुठेतरी दिसला एक छोटसा गडवा
पाण्याची चाहूल लागली त्यास त्यात
चार थेंबच होते साठले तळात

हुशार कावळ्याची गोष्ट नसे त्यास ज्ञात
खुपसले पाण्यासाठी अपुले तोंड गडवयात
हाय परी ह्याचा झाला  भलताच  विपर्यास
अडकले तोंड त्यात जसा पडला गळी फास

शोधत पाठी आली लेकराची ही माय
तिच्यासाठी पिल्लू दुधावरची ती साय
कसे काय सोडवू  केले बहुत  कयास
व्यर्थ परी ठरले सारे तिचे सायास

उराशी धरिले फुटला वात्सल्याचा पान्हा
गडवयासहित बिलगला आईला कान्हा
दृश्य ते पाहुनी धावले मनुष्य प्राणी
जाणिली न तिने परी त्यांच्या मदतीची वाणी

जवळी न कोणा येऊ देई जराशी
पळे दूर  बाळाला घेउनी उराशी
खाता न येई पिलाचे गडवयात तोंड
पाण्यासाठी अडकली अशी गळ्यात धोंड

असे उलटले  नऊ दिसा मागुनी दिस
दया मग आली त्या क्रूर नियतीस
जगण्याची आता व्यर्थ झाली शर्थ
निपचित झाले पिल्लू उरला न देही अर्थ

--प्रसाद शुक्ल